Saturday, May 2, 2009

चोरांच्या चक्कीमध्ये .... हे असेच चालू राहणार...!

चोरांच्या चक्कीमध्ये
जनता ही भरडु लागली
आल्या पुन्हा निवडणुका
पुन्हा गर्दी होऊ लागली
कालपर्यंत तोंड त्यांचं
कधी दिसलं नव्हतं..
आज पुन्हा काळं तोंड घेऊन
बेशरम दाखवे हात..
घड्याळ कधीची बंद पडली
दहा वाजून दहा मिनीटेच त्यात....
वेळ कधीची निघून गेली
पण हिची काटे ना पुढे जात.....

चिखल केला सगळीकडे
अन् म्हणे कमळ फुलेल पुन्हा
अहो पाण्यातही फुलू शकते
बिचाऱ्या कमळाचा काय गुन्हा..
पण चिखल केल्याशिवाय
तुमचं जमेल तेव्हा ना...
सायकल बिचारी काय करणार
नाचता येइना अंगण वाकडं
नेत्यांसंगे अभिनेत्यांची
वाकोल्या करती नौटंकी माकडं...

वाघ केव्हातरी गर्जायचा
कधी धनुष्यबाण चालायचा
पण ह्या जंगलात आता
शावक आले कितीतरी
कारण वाघ म्हातारा झाला...
केरळपासून हत्ती निघाला
दिल्लीची स्वारी करण्याला
माहित नाही कधी पोहचणार
रस्त्यात आता कुणाकणाला
कसा हा कुचलत निघाला...

विळा घेऊन डावे निघाले
जनतेची पिकं काढणार
नाहिच काही जमलं तर
सरकारला विळ्याने कापणार...
वा रे ही लोकशाही
अन् वा रे ही नेतेमंडळी
बाजारात दुकाने मांडली सर्वांनी
कोण जाणे कुणाचा माल खपणार ....

कधी धर्माचं कधी जातीचं
कधी भाषेचं कधी मातीचं
राजकारण म्हणे चालणार..
मरा तुम्ही असेच मरा
आम्ही मात्र रोटी शेकणार..
मेल्याशियाव ह्यांची
निव्रुत्ती होत नाही
अनं जनतेला मारल्याशिवाय
ह्यांना मरण येत नाही......

म्हणे सुजाण नागरीक आम्ही
मतदान हे केलेच पाहिजे
पण का म्हणुन आणि कशासाठी....
ज्यांना मते देणार
ते तर तिकडे जाऊन
स्वत:चा आत्मा विकणार...
आहे का एकतरी सच्चा
आहे का एकतरी अच्छा
अहो चोरांचा बोलबाला हो...
बाकी... जनता काय करणार...!
अन् म्हणुन….
हे असेच चालू राहणार...!

कवि - सतिश चौधरी

No comments:

Post a Comment